Tuesday, 15 March 2016

मोदीजी, ओवेसी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का ?



" भारत माता की जय " बोलणार नाही अशी दर्पोक्ती करणाऱ्या ओवेसी वर देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे अशी तमाम भारतीयांची व खऱ्या देशप्रेमी नागरिकांची नैसर्गिक भावना आहे. प्रश्न हा आहे की , नरेंद्र मोदी तसे करणार का ?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैय्या कुमार व त्याच्या शेकडो सहकारी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखविणाऱ्या मा.नरेंद्र मोदींना ओवेसींचा गुन्हा त्या विद्यार्थांच्या तुलनेत सौम्य वाटतोय कि काय ?

कन्हैय्या देशद्रोही आहे की नाही ? त्याने देशविरोधी घोषणा दिल्या होत्या का ? ज्या व्हिडीओ क्लिप च्या आधारे त्याच्यावर आरोप ठेवले गेले होते ती खरी आहे की खोटी आहे ? या प्रश्नांची उत्तरे तपासामध्ये मिळतील. परंतु कन्हैय्या व त्याचे सहकारी हे विद्यार्थी नेते आहेत. त्यांच्या जेलमधून बाहेर आल्या नंतरच्या भाषणावरून तो देशाच्या राज्यघटनेचा व देशाचा आदर करतो असे स्पष्ट होते. तरीही हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने या संदर्भात न्यायालय काय तो निर्णय घेईल.

परंतु ओवेसीच्या बाबतीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मा.मोदी साहेब कुठले पुरावे गोळा करत आहेत? ओवेसीने आज पहिल्यांदा देशाबद्दल असे उद्गार काढले असे नाही, यापूर्वी देखील अनेक वेळा त्याने अशा प्रकारची चिथावणीखोर भाष्ये, भाषणे केली आहेत. परंतु मोदींनी कधीही या संदर्भात ओवेसीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले नाहीत.

त्यामुळे ओवेसी जे काही बरळतो ते केवळ मुसलमानांना हिंदूंच्या विरुद्ध चिथावणी देणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. अशा वक्तव्यामुळे या देशातील हिंदूंची माथी भडकणार हे ओवेसीला चांगले माहित आहे. मुसलमान समुदाय देखील ओवेसीच्या या वक्तव्याला १००% पाठींबा देणार नाही. परंतु १००% हिंदू मात्र या मुद्द्यावर एकतर्फी फक्त ओवेसीच्या नव्हे तर सबंध मुस्लीम समाजाच्या विरोधामध्ये जावे हेच तर ओवेसीच्या त्या वक्तव्या पाठीमागचे मुख्य प्रयोजन आहे.

आता प्रश्न आहे तो, याचा राजकीय फायदा कोणाला होणार ? ओवेसीच्या वक्तव्यामुळे हिंदू एकवटतो हे मा.मोदींना, मा.अमित शहांना व आरएसएस ला चांगलेच माहित आहे. त्यामुळे ओवेसीचे प्रस्थ जेवढे वाढेल तेवढे भाजपच्या फायद्याचे आहे. ओवेसीला जेवढे मोकळे रान दिले जाईल तेवढा भाजपचा फायदा होत राहील असे सरळ सरळ राजकीय गणित आहे.

मा.मोदींना व आरएसएस ला खरंच देशप्रेमाचा व हिंदूचा पुळका असता तर सतत हिंदूंच्या विरुद्ध जाहीर आग ओकणाऱ्या व देशाविरुद्ध युध्द पुकारण्याची भाषा करणाऱ्या ओवेसीचा पुरता बंदोबस्त करणे मा.मोदींना सहज शक्य आहे.

परंतु ते तसे करणार नाहीत. कारण लाखो, करोडो रुपयांची विकासकामे करून जेवढी मते मिळवता येणार नाहीत, तेवढी मते ओवेसीच्या एका वक्तव्याने हिंदू मतांचे केंद्रीकरण होऊन मिळतात असा साधा हिशोब आहे.
मा.मनमोहनसिंह सरकार असतांना देखील हेच ओवेसी लोकसभेत खासदार होते. त्यावेळेस ओवेसीची अशा पद्धतीची चिथावणीखोर भाषा नव्हती. परंतु देशामध्ये मा.मोदी साहेबांचे सरकार आल्यानंतर ओवेसीला भलताच चेव आलाय. मा.मनमोहनसिंग सरकार असतांना ओवेसीची एमआयएम कुठे होती ? आणि आज कुठे आहे ? केवळ हैद्राबाद पुरती मर्यादित असलेली एमआयएम आता (मोदी सरकार आल्यानंतर) देशव्यापी झाली.
कट्टर हिंदुत्वाच्या तुष्टीकरणाच्या वातावरणात देशातील मुसलमान देखील कट्टर मुस्लिम नेतृत्वाच्या आश्रयात जाण्याचा प्रयत्न करणारच. या परिस्थितीत अधिकची जबाबदारी कुणाची ?

मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असे म्हणणारे मद्यभान भाजपा नेत्यांना त्यांच्या नेतृत्वांकडून मौन प्रोत्साहन मिळते. गोमांस खाल्याचा संशयावरून एखाद्या गरीब मुसलमानाला सबंध गाव ठेचून मारतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यार्थी संघटना काढून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली जाते. कुठल्याही व्हिडीओच्या आधारे शेकडो विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. तेव्हा निश्चितच देश चालविण्याची जबाबदारी अतिशय बेजबाबदार लोकांच्या हातात गेल्याचे प्रमाणित होते.

मा.मोदी साहेब अतिमहत्वकांक्षेपायी या देशावर हुकुमशाही लादतील अशी भीती त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते मा.लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेकांना वाटते.परंतु भारत देशात ते एवढ्या सहजासहजी शक्य नाही. भारतीय जनमानस हे लोकशाही मुल्यांनी ओतप्रोत भरलेले आहे. याची मा.मोदी साहेबांना देखील कल्पना आहे. परंतु कधीना कधी मा.मोदी साहेबांना हुकुमशाही आणून स्वतःच्या हातात सर्व सत्ता एकवटून स्वतःच्या मताप्रमाणे राबवायची आहे. त्यासाठी काय कराव लागेल ? भारतीय जनमानस हुकुमशहा मोदी नैसर्गिकपणे कसा स्विकारेल ? या करिता या देशामध्ये देशभक्त व देशद्रोही या विषयावर विभागणी झाली पाहिजे. त्याच वेळी कट्टर हिंदुत्वाला चिथावणी देणाऱ्या घटना अशा रितीने घडल्या पाहिजेत कि त्यामध्ये सरकारचा कुठेही हात दिसता कामा नये. ओवेसीची दर्पोक्ती देखील भाजपच्या दूरगामी रणनीतीचा भाग आहे. अशा पद्धतीने घटना वारंवार घडत गेल्या तर देशामध्ये हिंदुत्वाचा ज्वर तीव्र होणार व आपसुकच कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुन्हा एकदा मोदींची स्विकार्यता वाढणार अशी भाजपची रणनीती आहे.

एकदा का हिंदुत्वाचा ज्वर पेटला कि, पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारायचे आणि देशात आणीबाणी लागू करायची. हा असेल मोदींचा शेवटचा डाव ! जर हा डाव यशस्वी व्हायचा असेल तर मा.मोदींना १२५ कोटी जनतेला या आणीबाणीची अपरिहार्यता पटवून द्यावी लागेल.

अमोघ वकृत्वकला असलेले मोदी देशवासीयांपुढे '' मन की बात '' जेव्हा मांडतील तेव्हा देशातील जनता प्रसार माध्यमे देखील उपलब्ध परिस्थिती पुढे मोदींचे समर्थन करतील. कारण इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा देश महत्वाचा, देश प्रेम महत्वाचे, पाकिस्तानला धडा शिकविणे तर त्याहून अधिक महत्वाचे. जो मोदींच्या आणीबाणीला विरोध करील तो पाकिस्तान धार्जिणा व जो मोदींना पाठींबा देईल तो खरा देशभक्त अशी नवीन व्याख्या तयार होईल.

त्यामुळे ओवेसी काय बरळतो त्याही पेक्षा जास्त धोका त्याला तसे बरळू देण्याचे कंत्राट कुणी दिले आणि कशासाठी दिले याचा शोध घेणे हे जास्त महत्वाचे आहे.
















Tuesday, 1 March 2016

सदभावना यात्रा - खचलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी

          जगाचा पोशिंदा बळीराजा आज घडीला संकटात सापडला आहे. मागील सलग ३ - ४ वर्षापासूनच्या अवर्षणामुळे बळीराजा शेतकरी मोडकळीस आला असून त्याचं जगणं असह्य होत चाललेलं आहे.सततची नापिकी, पावसाच अत्यल्प प्रमाण यामुळे छत्रपती शिवरायांच्या कुळवाडी राज्यात शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात दयनीयता चालू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसून त्यांच्या ऱ्हदयात जगण्याविषयीचा अंकुर फुलविण्यासाठी व त्या बळीराजाच्या जगण्याला बळ देण्यासाठी राष्ट्रीय नेते, मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री मा.आ.अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून उगम पावलेली सदभावना यात्रा काढण्याचा संकल्प केलाय.


          आजघडीला एकीकडे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती बघितल्यास अतिशय बिकट आणि र्ह्द्यद्रावक आहे. दुष्काळामुळे पिकाचे योग्य उत्पादन न झाल्यामुळे धान्य टंचाई, पाऊस कमी पडल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रभर दिसत आहे. गोठ्यातील गाई - म्हशी चाऱ्या, पाणी वाचून हंबरड्याचा टाहो फोडतांना दिसत आहेत. आणि या सगळ्या आक्रोशापुढे बळीराजा आतून पुरता कोलमडला आहे. तर दुसरीकडे त्याच महाराष्ट्रात छमछ्मचा झगमगाट आणि मेक इन च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा खर्च उधळल्याचे अमानवी चित्र दिसते. अशावेळी बळीराजाच्या जगण्याला उमेद देण्यासाठी सत्ताधारी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक होते, पण सत्ताधाऱ्यांचे नेते केंद्रीय कृषिमंत्री मात्र शेतकरी प्रेमभंगामुळे आत्महत्या करत आहेत, तर खासदार गोपाल शेट्टी यांच्यासारखे भाजप नेते शेतकरी आत्महत्या हि Fashion बनत चाललेली आहे, तर राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते एकनाथराव खडसे शेतकऱ्यांना मोबाईल चे बिल भरायला पैसे आहेत मग वीज बिल भरायला काय अडचण असे वेदनादायक वक्तव्य करून अकलेचे तारे तोडत आहे. खरं तर यातून राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा व विकासाच्या दृष्टीची उणीव दिसून येते. निसर्गासोबतच विद्यमान सरकारच्या कार्यप्रणालीच्या धोरणातच दुष्काळ आढळून येतो. 
             राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार कार्यरत असतांना दुष्काळाचा सामना कसा करावा याचे उत्कृष्ट कौशल्य देशाचे नेते, मा.शरदचंद्रजी पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री मा.आ.अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या आघाडी सरकारने दाखविले होते. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा प्रदेशाध्यक्ष या नात्याने दुष्काळग्रस्त सहायता अभियान महाराष्ट्रभर राबवून शेतकऱ्यांना चारा, पाणी त्याचसोबत जगण्यासाठी मानसिक आधार देण्याचे कार्य या अभियानांतर्गत केले होते. आजघडीला विद्यमान सरकार शेतकऱ्यांच्या चारा छावण्या बंद करण्याचे कारस्थान करत आहे, पण आम्ही तत्कालीन दुष्काळी परिस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्त सहायता अभियानांतर्गत ६००० टन चारा महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांना, चारा छावण्यांना वाटप करण्याचे काम केले होते.

        नुसतेच चार देऊन भागात नसते किंवा दुष्काळाचे निवारण देखील होत नसते कारण दुष्काळ हा आजूबाजूच्या वातावरणा सोबतच मनात देखील पडलेला असतो. आणि हा मनातला दुष्काळ खऱ्या अर्थाने निसर्गाच्या दुष्काळापेक्षाही घातक ठरतो. म्हणून गावोगाव जाऊन शेतकऱ्यांची मन भरणी करून त्यांच्या मनाची मशागत करून त्यांना जगण्यासाठी उभे करण्याचे काम राष्ट्रवादी युवक च्या कार्यकर्त्यांनी केले होते.
           विद्यमान पंतप्रधान व मुख्यमंत्री महोदयांसारखे बोलघेवडे असून चालत नाही तर त्यासोबत कर्तुत्वाची जोडही असणे गरजेचे असते.म्हणून चारा आणि मानसिक आधारासोबातच "जलकुंभदान" अभियानांतर्गत तब्बल ३५०० पाण्याच्या टाक्यांचे वाटप देखील अनेक गावांमध्ये करण्यात आले. आम्ही येथे थांबलो नाही, तर दिवसातल्या २४ तासांमध्ये कधीही कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांच्या तक्रार निवारणासाठी टोल फ्री हेल्पलाईन चालू करून शेतकऱ्यांची लाइफलाईन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.या हेल्पलाईन अंतर्गत जवळपास एक ते दीड हजार गावांमध्ये जेथे पाण्याचे टंकर्स सुरु नव्हते तेथे प्रशानसनाकडे पाठपुरावा करून आम्ही ते सुरु केले.


            नेता सकारात्मक दृष्टीचा असेल तर कार्यकर्त्यांना देखील रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि असाच पायंडा शेतकऱ्यांचे जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचार आणि कृतीतून निर्मित Rashtrvadi Charitable Trust च्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी २००० रु.देऊन त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.



          सध्याचे सरकार असंवेदनशील झाल्यामुळे त्यांना त्यांनी दिलेल्या निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांसंदर्भात धोरण राबविण्यासाठी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने दुष्काळग्रस्त सहायता आंदोलन राज्याच्या प्रत्येक दुष्काळग्रस्त जिल्ह्यात जाऊन रस्ता रोको करण्यात आला. रस्त्यावर आंदोलन करतांनाच विधिमंडळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.आ.सुनीलजी तटकरे साहेब, विधानसभेतील गटनेते मा.आ.जयंत पाटील साहेब, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा.ना.धनंजय मुंडे साहेब यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी शेतकर्यांची कर्जमाफी, वीजबिल माफी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव अशा विविध मागण्यांकरिता विधिमंडळ हादरवून सोडले.


पण राज्य सरकार गेंड्याच्या चांदीचे असल्यासारखे वागत आहे. हे सरकार सुटाबुटातील तसेच भटजी - शेटजी यांचे असल्यामुळे यांना शेतकर्यांविषयी कळवला नाही. तसेच ज्यांनी कधी शेतकर्यांविषयी कळवळा नाही.तसेच ज्यांनी कधी शेती पहिली नाही, शेती केली नाही, ज्यांना शेतकऱ्यांच्या भावना कळत नाही असे व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले असतांना त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?
          वयाची पंच्चात्तरी झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांचे आधारस्तंभ मानले जाणारे मा.शरदचंद्रजी पवार साहेब हे शेतकऱ्यांसाठी धावून, राज्यभर दौरे करतात, शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेतात व त्या अनुषंगाने आदरणीय साहेबांनी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथील रेस कोर्स मैदानातील 'न भूतो, न भविष्यती' अशा "कृतज्ञता सोहळ्यात" आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना यानंतर वाढदिवसाचे सत्कार समारंभ टाळून पुढील ६ महिने पिडीत शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन करतात. म्हणून साहेबांच्या आवाहनाला सार्थ मानून मी माझा ३६ वा वाढदिवस साजरा न करता "सदभावना यात्रेच्या "माध्यमातून महाराष्ट्रातील ३६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १०,०००/- रुपयांची मदत करण्याचा निर्धार केला.


        खरं तर हे मदत किंवा दान नव्हे हे शेतकरी पुत्र या नात्याने आमचे कर्तव्य समजून सदर "सदभावना यात्रेचा प्रारंभ दि.७ मार्च पासून आदरणीय अजितदादा पवार व सौ.सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे सकाळी १०.३० वाजता करणार आहे. हि सदभावना यात्रा फक्त एक सोह्ळ्यापुरती मर्यादित राहणार नसून मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५० व मा.अजितदादा पवार यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६० अशा एकूण १३१० आत्म्ह्त्य्ग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी १०,०००/- रुपये मदत म्हणून करणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदभावना यात्रा राज्यातील प्रत्येक आत्म्ह्त्य्ग्रस्त तालुक्यामध्ये जाणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने कविवर्य ज्ञानेश वाकुडकर यांच्या कवितेने शेतकरी बांधवांना आवाहन करतो. 

" घोर जीवाला लावू नका,
पाठ जगाला दाऊ नका,
आम्ही तुमच्याच साठी आहो ना बाबा
तुम्ही जहर खाऊ नका. " 


                                                                                         उमेश पाटील 

                                                                                       संयोजक, सदभावना  यात्रा
                                                                                       सरचिटणीस तथा प्रवक्ता 
                                                                                       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
                                                                                       महाराष्ट्र प्रदेश 
                                                                                       मो.९८८१७४०९५०