Monday, 11 April 2016

समता आणि स्वातंत्र्याच्या ज्योतीचा सत्यशोधकी अर्थ....!

   " विद्येविना मती गेली 
    मती विना नीती गेली 
    नीती विना गती गेली
    गती विना वित्त खचले 
    वित्त विना शूद्र खचले 
    एवढे सर्व अनर्थ 
    एका अविद्येने केले "
          - महात्मा ज्योतिराव फुले .



        महात्मा फुले यांच्या ' अखंड ' मधील या इतिहास प्रसिद्ध काव्यपंक्ती म्हणजे हजारो वर्षांपासून या देशातील बहुजन समाजाला , मराठा , माळी , तेली , साळी , कोळी , धनगर , सनगर , वंजारी , बंजारी समाजाला आणि अठरा-पगड जाती आणि बारा बलुतेदारांना या देशातील शोषणवादी व्यवस्थेने शिक्षण नाकारले होते याचा सार म्हणजे या ओळी  आहेत .
       ज्ञानार्जनाचा हक्क शोषणवादी व्यवस्थेने नाकारल्यामुळे या देशातील शूर आणि पराक्रमी मराठा-बहुजन समाजाला आपल सर्वस्व गमावून बसाव लागल . पिढ्यान पिढ्या पुस्तकी शिक्षण न घेतल्या कारणाने मेंदूला एक कुंठीत अवस्था प्राप्त झाली . अआपल्या मेंदूवरच आघात केल्याने आपल्या हितासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवण्याची आपली नीती , आपले धोरणच बिघडले . आणि समाज या व्यवस्थेचा बळी ठरला आणि शोषणवादी व्यवस्थेच्या गर्तेत बुडाला .त्यामुळे समाज गतिहिन झाला .त्याचे वित्त शोषणवादी व्यवस्थेमुळे लुटल्या गेले .आणि त्यामुळे या धर्म व्यवस्थेच्या तळाला असलेला शूद्र समाज स्वत:चे नुकसान करून बसला आणि स्वत:ला धर्माच्या गुलामीत ढकलत राहिला आणि त्या सर्वाचे कारण - अज्ञान आणि विद्यार्जनापासून दूर जाणे होय .    
       छत्रपती शिवाजी महाराजांनी शोषणवाद्यांनी उभी केलेली ही धर्माची गुलामगिरी तुडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला . मनुस्मृतीने शूद्रांना समुद्र उल्लंघन नाकारले होते. समुद्र उल्लंघन करणे धर्माविरुद्ध कृती करणे समजले जायचे अश्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले स्वतंत्र आणि सर्वोच्च दर्जाचे आरमार उभे केले आणि भारताच्या नौदलाची स्थापना केली . महाराजांची ही कृतीमनुस्मृतीनुसार एक गंभीर गुन्हा होता . महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी तो गुन्हा केला .महाराज इथेच थांबले नाही ' ' नंद अंतम् क्षत्रिय अंतम ' असा या व्यवस्थेच्या स्थापनेमागचा इतिहासप्रसिद्ध सिद्धांत होता . म्हणजे काय तर नंद घराण्याच्या अंता बरोबर या पृथ्वीवरील तमाम क्षत्रिय संपुष्टात आले असा हा सिद्धांत सांगतो . त्यामुळे पृथ्वीवर फक्त आता तीन वर्ण उरलेत त्यामुळे चक्रवर्ती सम्राट होण्याचा आणि त्याच्याही पुढे छत्रपती होण्याचा अधिकार ब्राम्हणी-वैदिक व्यवस्थेनुसार आता कोणालाच शिल्लक नव्हता. छत्रपती शिवाजी मह़ाराजांनी शोषणवादी व्यवस्थेचा हा विषमताप्रेरित विकृत सिद्धांत पायदळी तुडवला आणि माणूस मग तो कोणीही असो जो जनकल्याणाचा विचार करतो त्याला छत्रपती होण्याचा अधिकार आहे हा समताधिष्ठीत सिद्धांत प्रस्थापित केला.

        महात्मा फुले यांच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता . ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांनी शोषणवादी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह केला आणि रयतेचे राज्य , स्वराज्य उभे केले त्याच पद्धतीने काळाची पाऊले ओळखत आणि ब्रिटिश शासनव्यवस्थेचा अंदाज ओळखत या देशातील शेतकरी , शेतमजूर , कामगार , दलित-अस्पृश्य आणि अठरा पगड जातिसाठी महात्मा फुले यांनी शाळा सुरु केल्या . त्यासाठी स्वत:च्या घरापासून सुरवात केली . स्वत:च्या पत्नीला सावित्रीमाईला नुसते शिक्षण देऊन महात्मा फुले थांबले नाहीत तर त्यांनी सावित्रीमाईला या देशातील पहिली स्त्री शिक्षिका केले .आज ज्या पुण्याची पुनर्स्थापना माँ साहेब जिजाऊ यांनी केली ते पूणे लुटून ,जाळपोळ करून  उजाड करण्यात आले होते .या भूमीवर गाढव फिरवून ही जमीन बंजर करण्यात आली होती . गुलामीची भली मोठी पहार ठोकून तुटकी चप्पल , मोडका झाडू आणि फाटके वस्त्र गुंडाळून ही भूमी अशुभ आहे आणि याला काढण्याचा प्रयत्न जो कोणी करेल त्याच्या वंशाचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही अशी धमकी तत्कालीन शोषणवादी व्यवस्थेच्या ठेकेदारांनी दिली होती. विज्ञानवादी विचारांचा आग्रह धरणा~या आणि शुभ-अशुभाची तमा न बाळगणा~या माँ साहेब जिजाऊंनी या बंजर जमिनीवर बाळराजे  शिवरायांच्या साक्षीने  सोन्याचा नांगर फिरवून ही भूमी परत सुजलाम सुफलाम आणि पवित्र केली. त्याच भूमीत सावित्रीमाई फुलेंनी शोषणवाडी व्यवस्थेविरूद्ध विद्रोह करून परत एकदा स्वातंत्र्याचे आणि स्वाभिमानाचे,शिक्षणाचे विचार प्रसरित करायला सुरवात केली. राज्यात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार असतांना आमचे सरकारने पुण्यातील विद्यापिठाला सावित्री मायेचे नाव देण्याचा निर्णय घेतला . सावित्री आई फुलेंचे नाव पुणे विद्यापिठाला देण्यासाठी आम्हाला खुप संघर्ष करावा लागला . पण जो संघर्ष क्रांतीज्योती सावित्रीमाईला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना करावा लागला त्यासमोर आमचा संघर्ष काहीच नाही .

      २४ सप्टेंबर १८७३ ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी  ' सत्यशोधक समाजाची ' स्थापना केली . याच्या  २०० वर्षे अगोदर २४ सप्टेंबर १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा दुसरा राज्याभिषेक अवैदिक अश्या  शाक्त पद्धतीने करवून घेतला आणि ६ जून १६७४ च्या राज्याभिषेकातील तांत्रिक चुका दुरुस्त केल्या .
    ' सर्वशक्ती जगद्पति त्याला नको कोणाची मध्यस्थी ' हे सत्यशोधक समाजाचे ब्रिदवाक्य आहे . त्यात महात्मा ज्योतिराव फुले आपल्या अठरापगड जातीच्या बारा बलुतेदारांना  स्पष्टपणे सांगून जातात की या जगाचा सर्वशक्ती जगद्पति जो आहे त्या ' निर्मिका ' पर्यन्त आपल्या मनातील भावना पोहचवण्यासाठी कोण्या दलालाची गरज नाही . याच्या पुढचा विचार संत गाडगे बाबांनी मांडला ते एका कीर्तनात म्हणतात - ' देवळात देव नाही तर पुजा~याचे पोट असते '. सत्यशोधक समाजाने स्वत:च्या विवाह पद्धती सुरु केल्या आणि परंपरागत शोषणवादी पुरोहितशाहीला , ब्राम्हणी व्यवस्थेचा ढोंगीपणा उघड केला. १९ फेब्रुवारी १८६८ ला महात्मा फुल्यांनी रायगडावर जाऊन जगातील पहिली शिवजयंती साजरी केली . 

      महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणास्थान मानायचे याच भावनेतून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा रचला . महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन याच्या  'राइट्स ऑफ मैन ' या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव होता . अगदी त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची रयतकल्याणी भूमिका , राज्यपद्धती आणि विचारांचा फार मोठा प्रभाव महात्मा फुले यांच्यावर होता . महात्मा फुले यांनी ज्या प्रमाणे शाळा काढल्या अगदी त्याचप्रमाणे स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला हा महात्मा फुलेंनी सामाजिक न्यायासाठी केलेला सत्याग्रह होता . १८८२ ला हंटर कमिशन ज्यावेळेस भारतात आले त्यावेळेस महात्मा फुले शेतक~याच्या वेशात हंटर कमिशन समोर उभे राहिले . आणि या देशाचा मालक हा शेतकरी-कष्टकरी समाज आहे हे आपल्या कृतितून सिद्ध केले . शेतक~यांचे दु:ख आणि प्रश्न आणि त्यावर तोडगा सुचवण्याचे काम महात्मा फुल्यांनी स्वाभिमानाने ब्रिटीशांना सांगितले . भविष्यात दुष्काळ आणि पिण्याचे पाणी ही एक समस्या बनून उभी राहील हे दूरदृष्टीकोण असणा~या फुल्यांनी वेळीच ओळखले आणि ब्रिटीशांकडून खडकवासला धरणाचे टेंडर घेतले . खडकवासला धरण ज्यांनी कोणी बघितले असेल त्यांना लगेच लक्षात येईल की धरणाचे बांधकाम अजूनही किती मजबुत आहे .यावरून महात्मा फुले हे किती अव्वल दर्जाचे इंजिनीयर होते हे लक्षात येईल .
          ' गुलामगिरी ' , ब्राम्हणाचे कसब ' ,  ' सार्वजनिक सत्यधर्म '  ही पुस्तके , ' त्रिरत्न ' हे नाटक , ' अखंड ' ह्या काव्यरचना आणि सत्सार १ , सत्सार २ ही विशेष महत्वाची पुस्तके लिहून महात्मा फुल्यांनी शोषणवादाविरूद्ध उभे राहण्याचे शस्त्रागार आपल्याला उपलब्ध करून दिले . समता आणि स्वातंत्र्याच्या ज्योतिचा हा सत्यशोधकी अर्थ म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले ....!

आज त्यांची १८९ वी जयंती त्यांच्या विचारांना आणि कृतीला विनम्र अभिवादन ...!
११ एप्रिल २०१६

Sunday, 3 April 2016

" धन्य तो शिवकाळ.... धन्य ते स्वराज्य ......! "


शिव तुझे नाव ठेविले पवित्र 
छत्रपती सूत्र विश्वाचे की  |              

       - संत तुकाराम महाराज


रयतेचा राजा , बळीराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अगदी सुरवातीलाच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात त्या प्रमाणे शिव -सिंधु संस्कृतीशी नात सांगणार " शिव " हे नाव इतक पवित्र आहे की ज्यात विश्वकल्याणाचा विचार आहे. आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण साधण्यासाठी छत्रपती सुत्राशिवाय तरणोपाय नाही . छत्रपती सूत्रात, स्वराज्य या संकल्पनेत रयतेच राज्य, बळीच राज्य, स्वराज्य निर्माण करण्याची क्षमता आहे असा आशावाद संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व्यक्त करतात .




       ही परिस्थिती तेव्हाची आहे ज्यावेळेस शिवाजी महाराज बाल्यावस्थेत होते. सगळीकडे रयत म्हणजे जिला आपल्या लोकशाही व्यवस्थेत संपूर्ण लोकशाहीची मालक म्हणून संबोधले आहे. त्या रयतेचे हाल हाल सुरु होते. मोगल, सुलतान आपल्या घोड्यांच्या टापांनी स्वराज्य तुडवत होते, बेचिराख करत होते, लुटत होते. रयतेला कोणी वाली नव्हता .रयतेच्या कल्याणाचा विचार करणारा कोणी नव्हताच. शाह्या बदलत होत्या पण रयतेवर होणारा अन्याय, अत्याचार सुरूच होता. विचार करा ज्या काळात " लोकशाही " या संकल्पनेचा जन्म सुद्धा झाला नव्हता. राष्ट्र कशाला म्हणतात ?  हे फारसे अवगत नव्हते त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यात रयत कल्याणाचा आणि रयतेच्या राज्याचा जिथे रयत स्वत: मालक असेल, तिला न्याय मागता येईल अश्या स्वराज्याचा विचार यावा ही गोष्टच कितीतरी मोठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरपण व्यक्त करणारी आहे. 


पण आज वाईट या गोष्टीचे वाटते की चिकित्सा करणारे काही समीक्षक हा मुद्दा लक्षात न घेता खरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात लोकशाही मूल्य जपणारे तत्व होते का ? असे बाळबोध प्रश्न विचारतात खरच अशा लोकांची, कीव करावीशी वाटते. अशा लोकांना माझे काही प्रश्न आहेत.आज आपल्या देशात लोकशाही आहे ...  बरोबर ! मग खरच आपल्या देशात आज सामाजिक न्यायाची संकल्पना पुरेपूर राबविल्या जाते का ? या देशात असहिष्णुता सारखे मुद्दे समोर का येतात ? खरच या देशात आर्थिक समानता आहे ? प्रत्येकाच्या गुणवत्तेची कदर या देशात आज लोकशाहीत केली जाते का ? अरे ज्या देशात आजही " भारत माता की जय " म्हणाव की म्हणू नये यावरून " राष्ट्रप्रेम " ठरवल जात असेल तो देश नेमका कोणत्या काळात जगतो आहे याचाही विचार झाला पाहिजे .

    
  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शेतकरी आत्महत्या करत होता काय ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयत आणि मुख्यत: शेतकरी उद्ध्वस्त व्हावा असे #Land_Acquisition_Bill " भूमि अधिग्रहण " सारखे कायदे " छत्रपतींचाच आशीर्वाद " मागून पास केले गेले असे एकतरी उदाहरण आहे काय ? 


    छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यापैकी काहीही होत नव्हते . शेतक~यांच्या घामाची आणि कष्टाची कदर केल्या जात होती. शिवराज्यात एकाही शेतक~याने आत्महत्या केली नाही . कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्वात सुखी जर कोण होता तर तो शेतकरी ..! म्हणून त्या काळात एक म्हण होती जी आजही कधी कधी वापरली जाते - " उत्तम शेती , मध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी "  हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे व्यवस्थापन होते . आणि आज शेतकरी यात कुठे आहे ? 

शेतक~याला का शौक आहे का मुल-बाळ उघड्यावर सोडून या जगाचा निरोप घेण्याचा ? आत्महत्या करण्याचा ? शेतक~याच्या मालाला योग्य भाव शिवकाळात मिळत होता .त्यामुळे शेतकरी आनंदात होता . आत्महत्येचे विचार त्याच्या डोक्यात तर जाऊ द्या पण त्याच्या मनालाही असे विचार स्पर्श करत नव्हते .आज नेमकी याउलट परिस्थिती आहे -आज शेतकरी दुष्काळात होरपळतो आहे . पण याचे कसलेच गांभीर्य सरकार आणि व्यवस्थेला , प्रशासनाला दिसत नाही . छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुष्काळ पडत नव्हता असे नाही . दुष्काळ हा जसा मानवनिर्मित आहे तसाच तो नैसर्गिक सुद्धा आहे . नैसर्गिक दुष्काळ मग एखादे वर्षी पाऊस व्यवस्थित झाला नाही . त्यामुळे पीकपाणी व्यवस्थित झाल नाही तर शिवाजी महाराजांचा आपल्या करवसुली अधिका~यांना स्पष्ट सांगणे असायचे की जुलूम जबरदस्ती करून कोणाकडूनही  शेतसारा वसूल करू  नये .  शेतक~यास त्रास होईल अशी कृती कोणाकडूनही घडता कामा नये . उलट शेतक~यास अश्या संकटाच्या काळात मदत करावी आणि शेतकरी पुन्हा पूर्व अवस्थेला (प्रगती वर) पोहचत नाही तोपर्यंत वसूली करू  नये. एवढे  प्रेम आजच्या रयतेला लोकशाही असताना  सुद्धा मिळते का ? याचे उत्तर - नाही असे आहे  आणि शिवरायांच्या व्यवस्थेचे वर्णन करताना म्हणावेसे वाटते. 

" धन्य तो शिवकाळ , धन्य ते स्वराज्य ....! "



शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज ३३६ वा स्मृतिदिन त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन ...!


                                                                                                                उमेश पाटील
                                                                                          (सरचिटणीस तथा प्रवक्ता, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)

Tuesday, 15 March 2016

मोदीजी, ओवेसी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का ?



" भारत माता की जय " बोलणार नाही अशी दर्पोक्ती करणाऱ्या ओवेसी वर देशद्रोहाचा गुन्हा तात्काळ दाखल झाला पाहिजे अशी तमाम भारतीयांची व खऱ्या देशप्रेमी नागरिकांची नैसर्गिक भावना आहे. प्रश्न हा आहे की , नरेंद्र मोदी तसे करणार का ?

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्हैय्या कुमार व त्याच्या शेकडो सहकारी विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखविणाऱ्या मा.नरेंद्र मोदींना ओवेसींचा गुन्हा त्या विद्यार्थांच्या तुलनेत सौम्य वाटतोय कि काय ?

कन्हैय्या देशद्रोही आहे की नाही ? त्याने देशविरोधी घोषणा दिल्या होत्या का ? ज्या व्हिडीओ क्लिप च्या आधारे त्याच्यावर आरोप ठेवले गेले होते ती खरी आहे की खोटी आहे ? या प्रश्नांची उत्तरे तपासामध्ये मिळतील. परंतु कन्हैय्या व त्याचे सहकारी हे विद्यार्थी नेते आहेत. त्यांच्या जेलमधून बाहेर आल्या नंतरच्या भाषणावरून तो देशाच्या राज्यघटनेचा व देशाचा आदर करतो असे स्पष्ट होते. तरीही हा विषय न्यायप्रविष्ठ असल्याने या संदर्भात न्यायालय काय तो निर्णय घेईल.

परंतु ओवेसीच्या बाबतीत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मा.मोदी साहेब कुठले पुरावे गोळा करत आहेत? ओवेसीने आज पहिल्यांदा देशाबद्दल असे उद्गार काढले असे नाही, यापूर्वी देखील अनेक वेळा त्याने अशा प्रकारची चिथावणीखोर भाष्ये, भाषणे केली आहेत. परंतु मोदींनी कधीही या संदर्भात ओवेसीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आदेश दिले नाहीत.

त्यामुळे ओवेसी जे काही बरळतो ते केवळ मुसलमानांना हिंदूंच्या विरुद्ध चिथावणी देणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. अशा वक्तव्यामुळे या देशातील हिंदूंची माथी भडकणार हे ओवेसीला चांगले माहित आहे. मुसलमान समुदाय देखील ओवेसीच्या या वक्तव्याला १००% पाठींबा देणार नाही. परंतु १००% हिंदू मात्र या मुद्द्यावर एकतर्फी फक्त ओवेसीच्या नव्हे तर सबंध मुस्लीम समाजाच्या विरोधामध्ये जावे हेच तर ओवेसीच्या त्या वक्तव्या पाठीमागचे मुख्य प्रयोजन आहे.

आता प्रश्न आहे तो, याचा राजकीय फायदा कोणाला होणार ? ओवेसीच्या वक्तव्यामुळे हिंदू एकवटतो हे मा.मोदींना, मा.अमित शहांना व आरएसएस ला चांगलेच माहित आहे. त्यामुळे ओवेसीचे प्रस्थ जेवढे वाढेल तेवढे भाजपच्या फायद्याचे आहे. ओवेसीला जेवढे मोकळे रान दिले जाईल तेवढा भाजपचा फायदा होत राहील असे सरळ सरळ राजकीय गणित आहे.

मा.मोदींना व आरएसएस ला खरंच देशप्रेमाचा व हिंदूचा पुळका असता तर सतत हिंदूंच्या विरुद्ध जाहीर आग ओकणाऱ्या व देशाविरुद्ध युध्द पुकारण्याची भाषा करणाऱ्या ओवेसीचा पुरता बंदोबस्त करणे मा.मोदींना सहज शक्य आहे.

परंतु ते तसे करणार नाहीत. कारण लाखो, करोडो रुपयांची विकासकामे करून जेवढी मते मिळवता येणार नाहीत, तेवढी मते ओवेसीच्या एका वक्तव्याने हिंदू मतांचे केंद्रीकरण होऊन मिळतात असा साधा हिशोब आहे.
मा.मनमोहनसिंह सरकार असतांना देखील हेच ओवेसी लोकसभेत खासदार होते. त्यावेळेस ओवेसीची अशा पद्धतीची चिथावणीखोर भाषा नव्हती. परंतु देशामध्ये मा.मोदी साहेबांचे सरकार आल्यानंतर ओवेसीला भलताच चेव आलाय. मा.मनमोहनसिंग सरकार असतांना ओवेसीची एमआयएम कुठे होती ? आणि आज कुठे आहे ? केवळ हैद्राबाद पुरती मर्यादित असलेली एमआयएम आता (मोदी सरकार आल्यानंतर) देशव्यापी झाली.
कट्टर हिंदुत्वाच्या तुष्टीकरणाच्या वातावरणात देशातील मुसलमान देखील कट्टर मुस्लिम नेतृत्वाच्या आश्रयात जाण्याचा प्रयत्न करणारच. या परिस्थितीत अधिकची जबाबदारी कुणाची ?

मोदींना विरोध करणाऱ्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे असे म्हणणारे मद्यभान भाजपा नेत्यांना त्यांच्या नेतृत्वांकडून मौन प्रोत्साहन मिळते. गोमांस खाल्याचा संशयावरून एखाद्या गरीब मुसलमानाला सबंध गाव ठेचून मारतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यार्थी संघटना काढून लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली जाते. कुठल्याही व्हिडीओच्या आधारे शेकडो विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. तेव्हा निश्चितच देश चालविण्याची जबाबदारी अतिशय बेजबाबदार लोकांच्या हातात गेल्याचे प्रमाणित होते.

मा.मोदी साहेब अतिमहत्वकांक्षेपायी या देशावर हुकुमशाही लादतील अशी भीती त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेते मा.लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेकांना वाटते.परंतु भारत देशात ते एवढ्या सहजासहजी शक्य नाही. भारतीय जनमानस हे लोकशाही मुल्यांनी ओतप्रोत भरलेले आहे. याची मा.मोदी साहेबांना देखील कल्पना आहे. परंतु कधीना कधी मा.मोदी साहेबांना हुकुमशाही आणून स्वतःच्या हातात सर्व सत्ता एकवटून स्वतःच्या मताप्रमाणे राबवायची आहे. त्यासाठी काय कराव लागेल ? भारतीय जनमानस हुकुमशहा मोदी नैसर्गिकपणे कसा स्विकारेल ? या करिता या देशामध्ये देशभक्त व देशद्रोही या विषयावर विभागणी झाली पाहिजे. त्याच वेळी कट्टर हिंदुत्वाला चिथावणी देणाऱ्या घटना अशा रितीने घडल्या पाहिजेत कि त्यामध्ये सरकारचा कुठेही हात दिसता कामा नये. ओवेसीची दर्पोक्ती देखील भाजपच्या दूरगामी रणनीतीचा भाग आहे. अशा पद्धतीने घटना वारंवार घडत गेल्या तर देशामध्ये हिंदुत्वाचा ज्वर तीव्र होणार व आपसुकच कट्टर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुन्हा एकदा मोदींची स्विकार्यता वाढणार अशी भाजपची रणनीती आहे.

एकदा का हिंदुत्वाचा ज्वर पेटला कि, पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारायचे आणि देशात आणीबाणी लागू करायची. हा असेल मोदींचा शेवटचा डाव ! जर हा डाव यशस्वी व्हायचा असेल तर मा.मोदींना १२५ कोटी जनतेला या आणीबाणीची अपरिहार्यता पटवून द्यावी लागेल.

अमोघ वकृत्वकला असलेले मोदी देशवासीयांपुढे '' मन की बात '' जेव्हा मांडतील तेव्हा देशातील जनता प्रसार माध्यमे देखील उपलब्ध परिस्थिती पुढे मोदींचे समर्थन करतील. कारण इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा देश महत्वाचा, देश प्रेम महत्वाचे, पाकिस्तानला धडा शिकविणे तर त्याहून अधिक महत्वाचे. जो मोदींच्या आणीबाणीला विरोध करील तो पाकिस्तान धार्जिणा व जो मोदींना पाठींबा देईल तो खरा देशभक्त अशी नवीन व्याख्या तयार होईल.

त्यामुळे ओवेसी काय बरळतो त्याही पेक्षा जास्त धोका त्याला तसे बरळू देण्याचे कंत्राट कुणी दिले आणि कशासाठी दिले याचा शोध घेणे हे जास्त महत्वाचे आहे.
















Tuesday, 1 March 2016

सदभावना यात्रा - खचलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी

          जगाचा पोशिंदा बळीराजा आज घडीला संकटात सापडला आहे. मागील सलग ३ - ४ वर्षापासूनच्या अवर्षणामुळे बळीराजा शेतकरी मोडकळीस आला असून त्याचं जगणं असह्य होत चाललेलं आहे.सततची नापिकी, पावसाच अत्यल्प प्रमाण यामुळे छत्रपती शिवरायांच्या कुळवाडी राज्यात शेतकऱ्यांची प्रचंड प्रमाणात दयनीयता चालू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आसवं पुसून त्यांच्या ऱ्हदयात जगण्याविषयीचा अंकुर फुलविण्यासाठी व त्या बळीराजाच्या जगण्याला बळ देण्यासाठी राष्ट्रीय नेते, मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री मा.आ.अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातून उगम पावलेली सदभावना यात्रा काढण्याचा संकल्प केलाय.


          आजघडीला एकीकडे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती बघितल्यास अतिशय बिकट आणि र्ह्द्यद्रावक आहे. दुष्काळामुळे पिकाचे योग्य उत्पादन न झाल्यामुळे धान्य टंचाई, पाऊस कमी पडल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याचे चित्र सध्या महाराष्ट्रभर दिसत आहे. गोठ्यातील गाई - म्हशी चाऱ्या, पाणी वाचून हंबरड्याचा टाहो फोडतांना दिसत आहेत. आणि या सगळ्या आक्रोशापुढे बळीराजा आतून पुरता कोलमडला आहे. तर दुसरीकडे त्याच महाराष्ट्रात छमछ्मचा झगमगाट आणि मेक इन च्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा खर्च उधळल्याचे अमानवी चित्र दिसते. अशावेळी बळीराजाच्या जगण्याला उमेद देण्यासाठी सत्ताधारी राज्यकर्त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक होते, पण सत्ताधाऱ्यांचे नेते केंद्रीय कृषिमंत्री मात्र शेतकरी प्रेमभंगामुळे आत्महत्या करत आहेत, तर खासदार गोपाल शेट्टी यांच्यासारखे भाजप नेते शेतकरी आत्महत्या हि Fashion बनत चाललेली आहे, तर राज्यातील सत्ताधारी पक्षाचे नेते एकनाथराव खडसे शेतकऱ्यांना मोबाईल चे बिल भरायला पैसे आहेत मग वीज बिल भरायला काय अडचण असे वेदनादायक वक्तव्य करून अकलेचे तारे तोडत आहे. खरं तर यातून राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा व विकासाच्या दृष्टीची उणीव दिसून येते. निसर्गासोबतच विद्यमान सरकारच्या कार्यप्रणालीच्या धोरणातच दुष्काळ आढळून येतो. 
             राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार कार्यरत असतांना दुष्काळाचा सामना कसा करावा याचे उत्कृष्ट कौशल्य देशाचे नेते, मा.शरदचंद्रजी पवार साहेब व माजी उपमुख्यमंत्री मा.आ.अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या आघाडी सरकारने दाखविले होते. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चा प्रदेशाध्यक्ष या नात्याने दुष्काळग्रस्त सहायता अभियान महाराष्ट्रभर राबवून शेतकऱ्यांना चारा, पाणी त्याचसोबत जगण्यासाठी मानसिक आधार देण्याचे कार्य या अभियानांतर्गत केले होते. आजघडीला विद्यमान सरकार शेतकऱ्यांच्या चारा छावण्या बंद करण्याचे कारस्थान करत आहे, पण आम्ही तत्कालीन दुष्काळी परिस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्त सहायता अभियानांतर्गत ६००० टन चारा महाराष्ट्रातील गरजू शेतकऱ्यांना, चारा छावण्यांना वाटप करण्याचे काम केले होते.

        नुसतेच चार देऊन भागात नसते किंवा दुष्काळाचे निवारण देखील होत नसते कारण दुष्काळ हा आजूबाजूच्या वातावरणा सोबतच मनात देखील पडलेला असतो. आणि हा मनातला दुष्काळ खऱ्या अर्थाने निसर्गाच्या दुष्काळापेक्षाही घातक ठरतो. म्हणून गावोगाव जाऊन शेतकऱ्यांची मन भरणी करून त्यांच्या मनाची मशागत करून त्यांना जगण्यासाठी उभे करण्याचे काम राष्ट्रवादी युवक च्या कार्यकर्त्यांनी केले होते.
           विद्यमान पंतप्रधान व मुख्यमंत्री महोदयांसारखे बोलघेवडे असून चालत नाही तर त्यासोबत कर्तुत्वाची जोडही असणे गरजेचे असते.म्हणून चारा आणि मानसिक आधारासोबातच "जलकुंभदान" अभियानांतर्गत तब्बल ३५०० पाण्याच्या टाक्यांचे वाटप देखील अनेक गावांमध्ये करण्यात आले. आम्ही येथे थांबलो नाही, तर दिवसातल्या २४ तासांमध्ये कधीही कुठल्याही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांच्या तक्रार निवारणासाठी टोल फ्री हेल्पलाईन चालू करून शेतकऱ्यांची लाइफलाईन दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला.या हेल्पलाईन अंतर्गत जवळपास एक ते दीड हजार गावांमध्ये जेथे पाण्याचे टंकर्स सुरु नव्हते तेथे प्रशानसनाकडे पाठपुरावा करून आम्ही ते सुरु केले.


            नेता सकारात्मक दृष्टीचा असेल तर कार्यकर्त्यांना देखील रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि असाच पायंडा शेतकऱ्यांचे जाणते राजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचार आणि कृतीतून निर्मित Rashtrvadi Charitable Trust च्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांना प्रत्येकी २००० रु.देऊन त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला.



          सध्याचे सरकार असंवेदनशील झाल्यामुळे त्यांना त्यांनी दिलेल्या निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची जाणीव करून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांसंदर्भात धोरण राबविण्यासाठी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने दुष्काळग्रस्त सहायता आंदोलन राज्याच्या प्रत्येक दुष्काळग्रस्त जिल्ह्यात जाऊन रस्ता रोको करण्यात आला. रस्त्यावर आंदोलन करतांनाच विधिमंडळात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.आ.सुनीलजी तटकरे साहेब, विधानसभेतील गटनेते मा.आ.जयंत पाटील साहेब, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा.ना.धनंजय मुंडे साहेब यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी शेतकर्यांची कर्जमाफी, वीजबिल माफी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव अशा विविध मागण्यांकरिता विधिमंडळ हादरवून सोडले.


पण राज्य सरकार गेंड्याच्या चांदीचे असल्यासारखे वागत आहे. हे सरकार सुटाबुटातील तसेच भटजी - शेटजी यांचे असल्यामुळे यांना शेतकर्यांविषयी कळवला नाही. तसेच ज्यांनी कधी शेतकर्यांविषयी कळवळा नाही.तसेच ज्यांनी कधी शेती पहिली नाही, शेती केली नाही, ज्यांना शेतकऱ्यांच्या भावना कळत नाही असे व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले असतांना त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ?
          वयाची पंच्चात्तरी झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांचे आधारस्तंभ मानले जाणारे मा.शरदचंद्रजी पवार साहेब हे शेतकऱ्यांसाठी धावून, राज्यभर दौरे करतात, शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेतात व त्या अनुषंगाने आदरणीय साहेबांनी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथील रेस कोर्स मैदानातील 'न भूतो, न भविष्यती' अशा "कृतज्ञता सोहळ्यात" आम्हा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना यानंतर वाढदिवसाचे सत्कार समारंभ टाळून पुढील ६ महिने पिडीत शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन करतात. म्हणून साहेबांच्या आवाहनाला सार्थ मानून मी माझा ३६ वा वाढदिवस साजरा न करता "सदभावना यात्रेच्या "माध्यमातून महाराष्ट्रातील ३६ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १०,०००/- रुपयांची मदत करण्याचा निर्धार केला.


        खरं तर हे मदत किंवा दान नव्हे हे शेतकरी पुत्र या नात्याने आमचे कर्तव्य समजून सदर "सदभावना यात्रेचा प्रारंभ दि.७ मार्च पासून आदरणीय अजितदादा पवार व सौ.सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे सकाळी १०.३० वाजता करणार आहे. हि सदभावना यात्रा फक्त एक सोह्ळ्यापुरती मर्यादित राहणार नसून मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५० व मा.अजितदादा पवार यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६० अशा एकूण १३१० आत्म्ह्त्य्ग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्येकी १०,०००/- रुपये मदत म्हणून करणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदभावना यात्रा राज्यातील प्रत्येक आत्म्ह्त्य्ग्रस्त तालुक्यामध्ये जाणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने कविवर्य ज्ञानेश वाकुडकर यांच्या कवितेने शेतकरी बांधवांना आवाहन करतो. 

" घोर जीवाला लावू नका,
पाठ जगाला दाऊ नका,
आम्ही तुमच्याच साठी आहो ना बाबा
तुम्ही जहर खाऊ नका. " 


                                                                                         उमेश पाटील 

                                                                                       संयोजक, सदभावना  यात्रा
                                                                                       सरचिटणीस तथा प्रवक्ता 
                                                                                       राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,
                                                                                       महाराष्ट्र प्रदेश 
                                                                                       मो.९८८१७४०९५०